तुझ्या-माझ्या संवादाचं
प्रतीक असलेल्या या कविता
आज कुणीतरी समजून घेऊ पाहात होतं….
समजून घेऊ पाहात होतं ,
माझ्यात सामावलेल्या तुला
आणि तुझ्यात सामावलेल्या मलाही…!
पण हे समजून घेणं इतकं सोपं नाही !
कारण या कविता म्हणजे तो संवाद नाही ,
तर त्या संवादाचे संचित आणि प्रतीक आहेत.
मूळ संवाद मात्र
वेगळ्याच पातळीवर घडला आहे.
या संचिताला समजून घेताना
तो कधीतरी तुझ्यापर्यंत पोहोचेल ,
तुझ्याशी संवाद साधू लागेल….
संचितापासून सुरू झालेला प्रवास
उगमाशी येऊन थांबेल.
तेव्हा त्याला माझ्या सार्या कविता उमजतील
या संचितामागील खरा अर्थ उमगेल
पण त्यावेळी मात्र त्याला
याहूनही अमूल्य आणि चिरंतन
असे काही गवसले असेल
संचित स्वशोधाचे….!
-यशश्री आगाशे.